पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पर्यावरण संवर्धन चळवळीतील अग्रणी आणि पवना नदीच्या संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजीव गोपाळ भावसार (वय ६४) यांचे रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.४० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त केली जात (Rajiv Bhavsar) आहे.
राजीव भावसार हे विलो मॅथर प्लॅट कंपनीचे निवृत्त उपमहाव्यवस्थापक होते. उद्योग क्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी स्वतःला पूर्णतः सामाजिक व पर्यावरणीय कार्यासाठी वाहून घेतले होते. ते पुण्यातील नामवंत भाऊ रंगारी यांचे वंशज होते. सामाजिक बांधिलकीचा हा वारसा त्यांनी आपल्या कार्यातून समर्थपणे पुढे(Rajiv Bhavsar) नेला.
पवना नदी संरक्षण व संवर्धन चळवळीचे ते एक मजबूत नेतृत्व होते. पवना नदीचे पावित्र्य जपावे, तिचे अस्तित्व टिकावे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी पवना जलदिंडी, पवनामाईची आरती यांसारखे उपक्रम सुरू केले. पवना नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून, ती शहराची जीवनवाहिनी आहे, ही भावना त्यांनी समाजमनात (Rajiv Bhavsar) रुजवली.
ते पवना जलदिंडी प्रतिष्ठान, आरोग्य मित्र फाउंडेशन आणि सिटीजन फोरम ऑफ पिंपरी-चिंचवड या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. तसेच ऑल इंडिया भावसार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून भावसार समाजबांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी विशेष योगदान (Rajiv Bhavsar) दिले.
सुमारे आठवडाभरापूर्वी पोलीस उपायुक्तांसोबत सुरू असलेल्या एका संवाद कार्यक्रमादरम्यान त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर करण्यासाठी बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत (Rajiv Bhavsar) मालवली.
त्यांच्यावर आज, सोमवार २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा प्राधिकरण परिसरातील त्यांच्या निवासस्थानातून निघणार (Rajiv Bhavsar) आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, विविध सामाजिक, पर्यावरणीय व नागरिक संघटनांकडून श्रद्धांजली आणि शोकभावना व्यक्त करण्यात येत (Rajiv Bhavsar) आहेत.
