पिंपरी | प्रतिनिधी :न्यायसंहितेमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे महिलांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि दाद मागणे अधिक सुलभ झाले असून, आता तक्रार नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जाण्याचीही गरज उरलेली नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी केले.
रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी रांजणगाव येथील गणपती मंदिर सभागृहात आयोजित विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या दोन दिवसीय दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषद माजी प्रांतमंत्री व पालक विजय देशपांडे, दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका सोनाली नाथ, सहसंयोजिका आरती भारती, कार्तिकी परदेशी, जिल्हामंत्री गणेश रौंधळ, नानासाहेब लांडे आणि संदेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. गोरडे म्हणाले की, महिलांकडे वाईट नजरेने पाहणे, चुकीचा स्पर्श करणे किंवा लज्जास्पद वर्तन करणे अशा घटनांविरोधात आता महिलांना घरबसल्या तक्रार दाखल करता येते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही फिर्याद नोंदवता येत असून, तक्रारीमध्ये आरोपींची संख्या, ओळख, घटनेचे ठिकाण, दिनांक, वेळ आणि तपशील अचूक नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी आवश्यक चौकशी करून अधिकृत फिर्याद नोंदवून घेतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शौर्य प्रशिक्षण वर्गादरम्यान दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका सोनाली नाथ आणि सहसंयोजिका आरती भारती यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना, दुर्गावाहिनी स्थापनेचा उद्देश आणि कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कार्तिकी परदेशी, प्रार्थना कुलकर्णी आणि अनिष्का परदेशी यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समता, दंडयुद्ध व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय देशपांडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री कौदरे यांनी केले, तर गणेश रौंधळ, नानासाहेब लांडे आणि संदेश साळुंखे यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली.
