प्रतिनिधी :राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. या योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही राज्यातील सुमारे २६ लाख ३४ हजार महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांवर अपात्र ठरण्याची टांगती तलवार निर्माण झाली (Ladki Bahin Yojana)आहे.
राज्यात सध्या या योजनेचे एकूण २ कोटी ४७ लाख लाभार्थी आहेत. मात्र, आवश्यक कागदपत्रांच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. ३० एप्रिल रोजी बँक बंद होईपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार असून सध्याची उष्णतेची लाट आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ही अंतिम संधी दिली आहे. दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana)आहे.
दरम्यान, योजनेच्या पडताळणीदरम्यान अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. सुमारे १२,४१५ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी घेतलेली रक्कम सरकारकडून वसूल केली जाणार(Ladki Bahin Yojana) आहे.
याशिवाय उत्पन्न मर्यादा ओलांडणारे, खोटी माहिती देणारे आणि अपात्र असूनही लाभ घेणाऱ्या व्यक्तींकडून सुमारे १६५ कोटी रुपयांची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, केवळ तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून आधी दिलेली रक्कम वसूल केली जाणार नाही, असा दिलासादायक निर्णय सरकारने घेतला(Ladki Bahin Yojana) आहे.
याचबरोबर या योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थ्यांचे प्रकारही समोर आले आहेत. राज्यभरात १२,७५७ पुरुषांनी स्वतःला महिला दाखवत या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले असून त्यांनी सुमारे २२.९६ कोटी रुपयांचा गैरफायदा घेतला आहे. तसेच बोगस महिला लाभार्थ्यांपैकी ६,४५७ जणींकडून सुमारे ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने याबाबत जिल्हा परिषदांना कारवाईचे आदेश दिले असले तरी आतापर्यंत केवळ ५० टक्के वसुलीच पूर्ण झाल्याचे समोर आले (Ladki Bahin Yojana)आहे.
३० एप्रिलनंतर या योजनेची संपूर्ण स्थिती स्पष्ट होणार असून अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे, तर पात्र महिलांना लाभ सुरू ठेवला जाणार (Ladki Bahin Yojana)आहे.
