पिंपरी (विवेक कुलकर्णी):पिंपरी-चिंचवड शहरात सध्या अनेक ठिकाणी भीषण ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली असून, याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मेट्रो प्रकल्पाचे सुरू असलेले काम, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत असलेल्या इमारती आणि खासगी वाहनांची वाढ यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसत (PCMC Traffic Issue) आहे.
शहरातील अनेक कुटुंबांमध्ये एकाच घरात चार-चार दुचाकी व चारचाकी वाहने असल्याचे चित्र आहे. त्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे नागरिकांचा ओढा कमी असल्याने रस्त्यांवरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पीएमपीएमएल बससेवा, लोकल ट्रेन याबाबतची अनास्था व अपुरी सुविधा हीदेखील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत(PCMC Traffic Issue) आहे.
निगडी, पिंपरी परिसर हा मुंबई–पुणे जुना महामार्ग असल्याने शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, निगडी परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आकुर्डी खंडोबा चौक, निगडी मुख्य चौक ते भक्ती-शक्ती चौक दरम्यान सकाळी कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळी सुटण्याच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. रस्त्यांवरील अरुंद मार्ग, खोदकाम आणि अपूर्ण कामांमुळे दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत(PCMC Traffic Issue) आहे.
याचप्रमाणे पुनावळे, हिंजवडी, बाणेर परिसरातील भुयारी मार्गांमध्येही रोजच वाहतुकीची कोंडी होत असून, आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत असून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांनाही मार्ग काढणे अवघड होत (PCMC Traffic Issue) आहे.
वाहतूक पोलिसांकडून नियोजन केले जात असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांवरील परिस्थिती पाहता हे नियोजन अपुरे ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करणे, पर्यायी मार्गांची योग्य आखणी, सिग्नल व्यवस्थेचे नियोजन आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत (PCMC Traffic Issue) आहे.
शहराच्या विकासासोबतच वाहतूक व्यवस्थेचा समतोल राखला गेला नाही, तर येत्या काळात पिंपरी-चिंचवड शहराला कायमस्वरूपी ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत (PCMC Traffic Issue) आहे.
या बातमीतला फोटो या पेपरचे वाचक राजेश थेटे यांनी काढलेला आहे
