Home महाराष्ट्र End Of Ajit Era:अजितपर्व संपलं : महाराष्ट्राने गमावला ‘कामाचा माणूस’

End Of Ajit Era:अजितपर्व संपलं : महाराष्ट्राने गमावला ‘कामाचा माणूस’

अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकाकुल. रोखठोक, धडाडीचे नेतृत्व, प्रशासनावर पकड आणि कामाचा ठसा कायम स्मरणात राहील.

by Admin
Spread the love

अजितपर्व संपलं… महाराष्ट्राच्या काळजावर उमटलेली कायमची जखम(End Of Ajit Era)

लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते देशातील दिग्गज नेत्यांपर्यंत प्रत्येकजण स्तब्ध उभा होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिव देहाला त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी अग्निदीप दिला… आणि त्या क्षणाने केवळ मैदानच नव्हे, तर टीव्हीसमोर बसलेला अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला.

डोळे आपसूक ओले झाले… घशात शब्द अडकले… आणि निःशब्द ओठांवर एकच वाक्य रेंगाळत राहिलं —

अजितपर्व संपलं…

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान प्रांगणात वेदघोषाच्या साक्षीने, लाखो—नव्हे अगणित—लोकांच्या उपस्थितीत अजितदादांवर अंत्यसंस्कार झाले. ही केवळ एका नेत्याची अंत्ययात्रा नव्हती; ही एका युगाची, एका शैलीची आणि ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतृत्वाची अखेर होती.

नियतीचा निष्ठुर घाव

कालची दुर्दैवी घटना नियती किती क्रूर असू शकते याचं जिवंत उदाहरण ठरली. पहाटेपासून रात्रीपर्यंत कामासाठी धावणारा हा नेता क्षणात काळाच्या पडद्याआड गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं, स्पष्टवक्तं आणि प्रभावी नाव अचानक हरपलं.

रोखठोक, धडकेबाज आणि थेट

रोखठोक बोलणं, धाडसी निर्णय घेणं आणि चूक झाली तर ती मान्य करून माफी मागण्याचं धैर्य — हे अजितदादांचं खरं व्यक्तिमत्त्व होतं. शब्द फिरवणाऱ्या राजकारणात दादा थेट बोलायचे आणि तेच करायचे. ज्या शरद पवारांचा हात धरून ते राजकारणात आले, त्या साहेबांचा हात सोडून दादा आज कायमचे निघून गेले, हे वास्तव आजही स्वीकारणं अवघड आहे.

शापित उपमुख्यमंत्री’ आणि अपूर्ण स्वप्न

प्रचंड कॅलिबर, प्रशासनावर पकड आणि अनुभव असूनही मुख्यमंत्री पदापर्यंत न पोहोचणं हा त्यांच्या आयुष्यातील मोठा विरोधाभास. म्हणूनच कदाचित त्यांना ‘शापित उपमुख्यमंत्री’ असं म्हटलं गेलं. सत्तेच्या केंद्रात असूनही सर्वोच्च शिखर एक पाऊल दूरच राहिलं.

कुतूहलाचा विषय असलेलं व्यक्तिमत्त्व

अजित पवार कायम कुतूहल निर्माण करणारे नेते होते. प्रशासनावरची कमांड, जनसंपर्क, काटेकोर दिनचर्या, फिटनेस, सेन्स ऑफ ह्युमर, अचानक ‘नॉट रिचेबल’ होणं आणि राजकीय धक्का — सगळंच वेगळं होतं. विरोधक असतानाही ते तितकेच चर्चेत आणि सत्तेत असतानाही तितकेच प्रभावी होते.

सत्तेशिवाय लोकांची कामं होत नाहीत”

राजकारणात फार थोडे लोक इतके स्पष्ट असतात. “सत्तेशिवाय लोकांची कामं होत नाहीत” हे त्यांनी कुठलीही साखर न लावता सांगितलं. लोकप्रियतेसाठी नव्हे, तर वास्तवासाठी.

“माझ्या लोकांच्या तोंडाला पानं पुसायची नाहीत, त्यांना भाजी-भाकर द्यायची आहे” — हीच त्यांची राजकीय भूमिका होती.

दादा स्टाईल — धाक, आपुलकी आणि विनोद

कार्यकर्त्यांना दम देणं, अधिकाऱ्यांना फैलावर घेणं, पत्रकारांना खोचक उत्तरं देणं आणि त्याच वेळी मिश्कील टोमणे मारणं — ही ‘दादा स्टाईल’ होती. त्यांच्या कोपरखळ्या कुणालाही बोचत नसत, कारण त्या माणुसकीतून येत.

धक्कातंत्राचा शेवटचा धक्का

पहाटेचा शपथविधी असो, पक्षफुटी असो किंवा ‘नॉट रिचेबल’ होणं असो — अजित पवार धक्कातंत्राचे प्रणेते होते. पण जातानाही त्यांनी धक्का नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला शॉक दिला.

राजकीय पोकळी आणि मानवी वेदना

अजित पवारांच्या जाण्याने प्रशासनावर मांड ठोकून बसणारा नेता राज्याने गमावला. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार, साखर पट्टा, कृषी आणि शिक्षण क्षेत्र पोरकं झालं. शरद पवारांची थकलेली देहबोली, मातोश्रींचं दुःख आणि कुटुंबीयांचे अश्रू — हे दृश्य अस्वस्थ करणारं होतं.

कामाचा माणूस’ — शेवटपर्यंत

“जोपर्यंत माझे हातपाय हालतात, तोपर्यंत तुमचं भलं करीन” — हे शब्द त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब होते. फायली, अर्ज, सामान्य माणसाच्या तक्रारी — हेच त्यांचं राजकारण होतं. दोष असतीलही, पण कामाचा ठसा मात्र अमिट राहिला.

शेवटचा शब्द

आज महाराष्ट्राने केवळ एक नेता नाही, तर घरातला हक्काचा ‘कामाचा माणूस’ गमावला आहे. अंत्यसंस्कार झाले, पण मनातली सल संपलेली नाही.

अजितपर्व संपलं…

पण दादा, तुमचं काम, तुमची शैली आणि तुमचा ठसा महाराष्ट्र विसरणार नाही.

We love you, Dada.

You will always be missed. 🖤

— विवेक कुलकर्णी

(या लेखातील काही माहिती विविध स्रोतांवर आधारित आहे.)


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00