(पिंपरी प्रतिनिधी दिनांक : १९ एप्रिल २०२६) ‘क्रांतिवीर चापेकरबंधूंच्या हौतात्म्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह असंख्य क्रांतिकारकांच्या मनात देशभक्तीचे स्फुलिंग प्रज्वलित झाले आणि त्याची परिणती स्वातंत्र्यप्राप्तीत झाली!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी व्यक्त (Chapekar Bandhu Smrutidin) केले.
क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित अभिवादन समारोहात प्रमुख वक्ते म्हणून योगेश सोमण बोलत होते. आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष डाॅ. अशोक नगरकर, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, विनोद बन्सल, डाॅ. नीता मोहिते, डाॅ. शकुंतला बन्सल, कांता जाधव, रवींद्र नामदे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे तेरावे वंशज दादाराव जाधव – नाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला; तसेच पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ॲड. सतीश गोरडे यांनी पुस्तकाचे अंतरंग उलगडून (Chapekar Bandhu Smrutidin)सांगितले.
योगेश सोमण यांनी क्रांतिवीर चापेकरबंधूंचा रँडवधाचा इतिहास आणि स्वातंत्र्यासाठी प्रेरक ठरलेल्या बाबींचे ओघवत्या शैलीतून वर्णन करीत, ‘पालकांनी विद्यार्थ्यांसमवेत ऐतिहासिक वास्तूंना आवर्जून भेटी देऊन इतिहास समजून घ्यावा!’ असे आवाहन केले. किशोर चव्हाण यांनी, ”गोद्या आला रे!’ हे शब्द आजही वीरश्री निर्माण करतात. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजीमहाराज यांचा तिसरा डोळा होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने ज्ञात – अज्ञात क्रांतिकारकांचे उभारलेले संग्रहालय ही अतिशय स्तुत्य बाब आहे!’ असे गौरवोद्गार काढले. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून चापेकर बंधूंच्या हौतात्म्यानंतर ७२ वर्षांनी पहिल्यांदा त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला आणि आजतागायत ती परंपरा कायम आहे, अशी माहिती दिली. दीपप्रज्वलन, अखंड भारतमाता आणि क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात (Chapekar Bandhu Smrutidin)आला.
त्यापूर्वी, सकाळी भव्य अभिवादन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. समारोहाआधी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, क्रांतिवीर बाळकृष्ण चापेकर बालक मंदिर, क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर, क्रांतिवीर चापेकर विद्यालय, खिंवसरा पाटील विद्यामंदिर आणि लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय या शाळांमधील विद्यार्थ्यांनी चापेकरबंधूंच्या जीवनातील विविध प्रसंगांचे नाट्य आणि गीतांच्या माध्यमातून सादरीकरण केले; तसेच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केलीत. मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना सन्मानित करण्यात आले क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक अतुल आडे, समर्थ डोंगरे, सागर शेवाळे, विनोद डोरले, किरण गायकवाड आणि शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले आणि स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक नगरकर यांनी आभार मानले. संपूर्ण वंदे मातरमने समारोहाची सांगता करण्यात(Chapekar Bandhu Smrutidin) आली.
