*॥ थेंब थेंब पाणी ॥*
प्रत्येक थेंब पाण्याचा जपायलाच हवा
उद्यासाठी जमिनीमध्ये साठवायला हवा !
धरणे,तलाव,बंधाऱ्यांनी गाठला आहे तळ
निम्मा महाराष्ट्र सोसतो आहे दुष्काळाची झळ !
म्हणून म्हणतो आपण आता पुढं आल पाहिजे
जमेल तेवढे पाणी आता वाचवलच पाहिजे !!
बंद करू आता आपण शॉवरखाली अंधोळ
विनाकारण सदा न कदा नाही सोडणार नळ !
टपटपणारे नळ सुद्धा दुरुस्त करून घेऊया
प्रत्येक गोष्टीसाठी आता मोजून पाणी वापरूया !!
फ्लॅश मुळे कित्येक लिटर पाणी जातय वाया
मशिनशिवाय कपडयांची निघत नाही काया !
मशिन मधील पाण्याचा पुर्न वापर करूया
संडासच्या फ्लॅश साठी हेच पाणी वापरूया !!
नळ सोडून आता दाढी करत नका बसू
बेसीनमध्ये नळ सोडून दात नका घासू !
हवं तेवढच पाणी आता भाडयांमध्ये घेऊ
बादलीमध्येच घेऊन पाणी हातपाय धुऊ !!
जागेवरती उभी तरी रोजच धुतात गाडी
हवी तेव्हाच पुसून घ्या ना, बचत करा थोडी !
अंगणामध्ये रोजचाच घालू नका सडा
दुष्काळग्रस्त लोकांचा विचार करा थोडा !!
धुवत न बसता आता टेरेस पुसून घ्यावा
रोजच्याच फरशांना थोडा आराम करू द्यावा !
बागेमधील झाडांना जरूर तेवढेच पाणी द्या
पण, न विसरता पाखरांसाठी दाणा – पाणी ठेवा !!
हवं तेवढं पाणी प्या, सांडू मात्र नका
तेच पाणी नंतरसाठी भांडयामध्ये झाका !
पाणी शिळं होत नसतं लक्षात ठेवा जरा
वर्षानुवर्ष पोटामध्येच पाणी साठविते धरा !!
जलसंवर्धन करण्यासाठी देऊ जगास हाक
पाणी म्हणजे जीवन गड्या,आळस झटकून टाक !
याचसाठी सगळीकडे लावू आपण झाडे
पर्यावरणाच्या रक्षणासाठी लक्ष देऊ थोडे !!
दिवसे दिवस पाऊस काळ होतो आहे कमी
पुढे पाऊस पडेलच याची कोण देईल हमी ?
भविष्याचा विचार करता जपले पाहिजे पाणी
पाणीच जर पेटले तर वाचणार का कोणी ?
याचसाठी थेंब थेंब पाणी आता जपायलाच हवं
पुढील पिढीसाठी आपण एवढं तरी करायलाचं हवं !
*- कैलास भैरट, चिंचवड*
*(भ्रमणध्वनी : ९९७०६२२६६८)
आज आपल्या समोर पाणी टंचाईचे भयाण संकट डोकावत आहे, याच समस्येवर शहरातले जेष्ठ साहित्यिक कैलास भैरट यांची ही कविता

‘थेंब थेंब पाणी’ या कवितेत कवी कैलास भैरट यांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी वाचवावे, पुनर्वापर करावा आणि जलसंवर्धनासाठी झाडे लावून पर्यावरणाचे संरक्षण करावे, असा प्रभावी संदेश दिला आहे. आजचा प्रत्येक वाचवलेला थेंबच पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करू शकतो, हीच या कवितेची मध्यवर्ती भावना आहे.
