मोरया हॉस्पिटलच्या ३०० कॉक्लिअर इम्प्लांट सोहळ्यात भावनांचा ओलावा; आमदार जगतापांची दहा मुलांची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा
चिंचवड :कर्णबधिर मुलांना पुन्हा नव्या जगाचा ‘आवाज’ देणाऱ्या मोरया हॉस्पिटलच्या ३०० कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया पूर्णत्व सोहळ्यात रविवारी हृदयाला स्पर्श करणारे क्षण अनुभवायला मिळाले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य आणि पालकांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे ( Implant Success )अनावर अश्रू संपूर्ण वातावरण भारावून टाकणारे होते.
या विशेष सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार शंकरभाऊ जगताप यांनी कर्णबधिर मुलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. कॉक्लिअर इम्प्लांटची आवश्यकता असलेल्या दहा मुलांचे संपूर्ण संगोपन खर्च चंद्ररंग सोशल फाउंडेशनमार्फत उचलण्याचे त्यांनी जाहीर केले. या उदार घोषणेने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
जगताप यांनी मोरया हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत महाभारतातील संजयाचा उल्लेख केला.
“धृतराष्ट्राला संजयाने युद्धभूमीतील घडामोडी ऐकवल्या; त्याचप्रमाणे मोरया हॉस्पिटल या मुलांना जगाचा आवाज परत देणारे आधुनिक ‘संजय’ ठरले आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीमचे अभिनंदन केले.
भावनिक क्षणांनी भरलेले अनुभवकथन
कॉक्लिअर इम्प्लांटनंतर ऐकण्याची क्षमता परत मिळालेली मुले या सोहळ्यात उपस्थित होती. नीरजा घोडके, देवांश पाटील, आसावरी कुलकर्णी, रितिका सोमाणी, ओम साठे आणि प्रथमेश सावंत यांनी शस्त्रक्रियेनंतरचे अनुभव कथन करताना सभागृहातील वातावरण भावनिक केले.
“माझं मूल आता ‘आई’ म्हणतं… आवाज ओळखतं… त्याहून मोठं सुख नाही,” असे एका पालकांचे शब्द ऐकल्यावर क्षणभर सर्वत्र शांतता आणि अश्रूंची उधळण दिसून आली.
मान्यवरांची उपस्थिती आणि संवेदशील कार्याचा गौरव
कार्यक्रमाला आमदार शंकरभाऊ जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र संपर्क प्रमुख कैलास सोनटक्के, शल्यचिकित्सक डॉ. महेंद्र गरड, उद्योजक दिलीप व प्रवीण सोनिगरा तसेच मोरया हॉस्पिटलचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. अक्षय वाचासुंदर, अमित पाटील, मुग्धा आरकडी, रक्षा देशपांडे आणि अविनाश वाचासुंदर यांनी ३०० शस्त्रक्रियांच्या मागील सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती दिली. टीमवर्क, समर्पण आणि संयम या प्रवासातील मुख्य आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
मानवतेचा क्षण साजरे करणारा उत्सव
प्रास्ताविक डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अरविंद पंडित यांनी केले. सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी यांनी पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन भगवान तांबे, सारिका मोरे, संजय कुलकर्णी आणि कर्मचारी प्रतिनिधींनी उत्तम रीतीने सांभाळले.
कॉक्लिअर इम्प्लांट ही फक्त वैद्यकीय प्रक्रिया नाही—तर एका कुटुंबाला पुन्हा आशेची किरण देणारी जीवनदायी सेवा आहे. ३०० शस्त्रक्रियांचा आजवरचा प्रवास म्हणजे शेकडो घरांमध्ये उमटलेले नव्याने ऐकू येणारे हृदयस्पर्शी आवाज.
हा सोहळा फक्त यशाचा नव्हता—तो आवाज परत मिळालेल्या मुलांच्या पुनर्जन्माचा उत्सव होता.
