संभाजीनगर (चिंचवड) – “संतांनी आपल्या विचारांनी नांगरलेल्या भूमीत आपण राहतो, हे आपले परमभाग्य आहे. अन्याय, अनीती, अधर्म आणि अनाचारावर मात करण्याची प्रेरणा संतसाहित्यातून मिळते. मनामनात साठलेली अविवेकाची काजळी दूर झाली तर समाज विवेकशील बनतो. विवेकशील समाजालाच सुदृढ समाज म्हटले पाहिजे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांनी उत्तम जीवनमार्ग दाखविला असून तो आजच्या काळातही तितकाच मार्गदर्शक आहे. संतांनी समाजाला विवेकवादाची शिकवण दिली,” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते ह. भ. प. राजेंद्र घावटे(Sant Pravachan) यांनी केले.
संभाजीनगर, चिंचवड येथील श्री दत्त मंदिरामध्ये गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील “मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेक दीप उजळी॥ ते योगिया पाहे दिवाळी॥ निरंतर॥” या ओवीचा आशय केंद्रस्थानी ठेवून घावटे यांनी संतवाङ्मयातील विवेक, ज्ञान आणि (Sant Pravachan)जीवनमूल्यांवर भाष्य केले.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शामकांत मोरे, दिलीप सावंत, अभिमन्यू भारसाकडे, दीपक पालांडे, आनंद देसाई, तुकाराम घारे, मुरलीधर वाघ, विजय जाधव आदी मान्यवर( Sant Pravachan)उपस्थित होते.
पुढे बोलताना घावटे म्हणाले, “बदलत्या काळातील आव्हाने ओळखून आचारशील आणि विचारशील पिढ्या घडल्या पाहिजेत. त्यासाठी भागवत धर्माचा मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी जीवनाला दिशा देणारी आहे. लालित्यपूर्ण, कोमल, सात्विक आणि रसाळ भाषेचा अनुपम आविष्कार ज्ञानेश्वरीत आढळतो. प्रत्येक ओवीचा भावार्थ समजून त्यातून प्रेरणा घेणे ही अखंड प्रक्रिया आहे. संतांच्या विचारांचा प्रकाश पिढ्यान्पिढ्या मार्गदर्शक ठरत आला आहे; यापुढेही तो टिकवण्याची जबाबदारी आपलीच आहे. समाजाच्या जडणघडणीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. केवळ मंदिरनिर्मितीपेक्षा संतसाहित्यातून समाजाचे प्रबोधन घडवणारी ‘समाज मंदिरे’ उभी राहिली, तर परिवर्तन(Sant Pravachan )नक्कीच घडू शकते.”
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अभिमन्यू (Sant Pravachan)भारसाकडे यांनी केले.
