(पुणे, पिंपरी, प्रतिनिधी ): पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १ सप्टेंबर २०२६ पासून अधिक भाडे मोजावे लागणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) ऑटो रिक्षा भाडेवाढीला मंजुरी दिली असून, नव्या दरानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. तसेच त्यानंतरचा प्रति किलोमीटर दर १७ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला( Pune Auto Fare) आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत रिक्षा भाडेवाढीसह परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
पुणे शहर आणि परिसरातील सार्वजनिक वाहतुकीत ऑटो रिक्षांचा मोठा वाटा असून, जिल्ह्यात सुमारे दीड लाख परवानाधारक रिक्षा कार्यरत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सीएनजीच्या वाढत्या किमती, वाहनांच्या सुट्या भागांचे वाढलेले दर, विमा, देखभाल व दुरुस्तीचा वाढता खर्च तसेच महागाईमुळे सध्याच्या भाड्यात व्यवसाय करणे परवडत नसल्याचे सांगत विविध रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आरटीओने नव्या भाडेदरांना मंजुरी( Pune Auto Fare) दिली.
नवीन दर लागू होण्यापूर्वी सर्व रिक्षाचालकांना आपल्या वाहनाच्या मीटरचे रीकॅलिब्रेशन करून घेणे बंधनकारक राहणार आहे. मीटरमध्ये आवश्यक बदल पूर्ण झाल्यानंतरच नव्या दरानुसार भाडे आकारता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, खटवा समितीच्या शिफारशी आणि निश्चित सूत्रानुसार करण्यात आलेल्या या भाडेवाढीचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने स्वागत केले आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, वाढती महागाई, सीएनजीचे वाढलेले दर, वाहनांच्या सुट्या भागांच्या किमती आणि महागाई निर्देशांकाचा विचार करून ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
ते म्हणाले, पूर्वी भाडेवाढीसाठी रिक्षाचालकांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत होता. मात्र महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने हकीम समिती आणि त्यानंतर खटवा समिती स्थापन केली. या समित्यांनी निश्चित केलेल्या सूत्रानुसार आता ठराविक निकषांच्या आधारे स्वयंचलित पद्धतीने भाडेवाढ लागू होत असल्याने रिक्षाचालकांना आंदोलन किंवा दीर्घ संघर्ष करण्याची गरज उरलेली नाही. ही राज्यातील कष्टकरी रिक्षाचालकांच्या दीर्घकालीन लढ्याची मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद ( Pune Auto Fare) केले.
भाडेवाढीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबा कांबळे यांनी सर्व रिक्षाचालक आणि मालकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. प्रत्येक रिक्षाचालकाने मीटरप्रमाणेच भाडे आकारावे, कोणत्याही प्रवाशाकडून अतिरिक्त भाड्याची मागणी करू नये तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना भाडे नाकारू नये, असे त्यांनी सांगितले. प्रवाशांशी नम्र आणि सन्मानपूर्वक वागल्यास रिक्षाचालकांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट( Pune Auto Fare) केले.

या निर्णयामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च काही प्रमाणात वाढणार असला, तरी वाढत्या इंधन आणि देखभाल खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे रिक्षा संघटनांचे मत आहे. १ सप्टेंबरपासून ही भाडेवाढ पुणे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक ऑटो रिक्षांसाठी लागू होणार ( Pune Auto Fare) आहे.
