क्रीडा विशेष | विवेक कुलकर्णी:तुलनेने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या आयर्लंडकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवाचे घाव अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनातून पुसले गेलेले नाहीत. सलग १२ टी-२० मालिका जिंकणारा आणि सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकून जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणारा भारतीय संघ एका पराभवामुळे प्रचंड टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत आजपासून इंग्लंडमध्ये सुरू होणारी टी-२० मालिका ही भारतासाठी केवळ आणखी एक द्विपक्षीय मालिका नसून प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयांची खरी परीक्षा ठरणार (India vs England) आहे.
या मालिकेपूर्वी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे यशस्वी कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून नेतृत्व काढून ते श्रेयस अय्यरकडे सोपविण्याचा निर्णय. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने सातत्याने मालिका जिंकल्या, संघाला आक्रमक ओळख मिळाली आणि जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व कायम ठेवले. अशा परिस्थितीत त्याला बाजूला करून श्रेयस अय्यरवर नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय अनेक चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांनाही अनपेक्षित वाटला. त्यामुळे या मालिकेत अय्यरवर केवळ फलंदाज म्हणून नव्हे, तर कर्णधार म्हणूनही स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे दडपण (India vs England)असेल.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत अंतिम अकरामध्ये त्याला स्थान न दिल्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली. आक्रमक फलंदाजी, निर्भय दृष्टिकोन आणि अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक झळकावण्याची क्षमता दाखवूनही त्याला संधी न मिळाल्याने चाहते संतप्त आहेत. आता इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्याला संधी मिळणार का, हा मोठा प्रश्न (India vs England) आहे.
मात्र, वैभवला संघात घ्यायचे तर बाहेर कोण बसणार? सातत्याने महत्त्वपूर्ण खेळी करणारा संजू सॅमसन की टी-२० क्रिकेटमधील भारताचा सर्वाधिक धोकादायक सलामीवीर अभिषेक शर्मा? दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने हा निर्णय संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम थेट मालिकेच्या निकालावर होऊ(India vs England) शकतात.
इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नसते. वेगवान खेळपट्ट्या, स्विंगला पोषक वातावरण आणि आक्रमक इंग्लिश क्रिकेट यामुळे ही मालिका भारतासाठी कठीण मानली जात आहे. अशा वेळी भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धचा पराभव विसरून नव्या जोमाने मैदानात उतरावे लागेल. फलंदाजीतील सातत्य, गोलंदाजांची अचूकता आणि श्रेयस अय्यरचे नेतृत्व या तीन गोष्टींवर भारताच्या यशाचे गणित अवलंबून (India vs England) असेल.
एकूणच, ही मालिका भारतीय क्रिकेटसाठी अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी ठरणार आहे. श्रेयस अय्यर नेतृत्वाची निवड योग्य ठरवतो का? वैभव सूर्यवंशीला संधी मिळते का? संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यापैकी कोणाला विश्रांती दिली जाते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयर्लंडविरुद्धच्या ठसठसणाऱ्या पराभवाची जखम भरून काढत भारत पुन्हा विजयाच्या मार्गावर परततो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसांत मिळणार असून, संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष आता इंग्लंड दौऱ्याकडे लागले (India vs England) आहे.
