(आकुर्डी, प्रतिनिधी):रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त महापालिका किंवा प्रशासनाचीच आहे, अशी आपली समजूत झाली आहे. पण नागरिक म्हणून आणि व्यावसायिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे, हे आपण अनेकदा (Social Responsibility)विसरतो.
आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील फूटपाथ परिसरातील हे आजचे चित्र आपल्या नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह उभे करते.
समोर दिसणारे हे दृश्य त्याचेच बोलके उदाहरण आहे. व्यवसाय करणे निश्चितच चुकीचे नाही; उलट त्यामुळे रोजगार निर्माण होतो आणि अर्थचक्राला गती मिळते. मात्र व्यवसाय करताना निर्माण होणारा कचरा रस्त्यावर टाकणे, सार्वजनिक जागा घाण करणे आणि “कोणी तरी येऊन साफ करेल” अशी मानसिकता ठेवणे, ही गंभीर सामाजिक बेफिकिरी आहे.
प्रशासनाकडून स्वच्छ रस्ते, उत्तम सुविधा आणि प्रभावी व्यवस्था यांची अपेक्षा आपण ठेवतोच; ती योग्यही आहे. पण त्याच वेळी आपण स्वतः सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे कर्तव्य पार पाडतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
स्वच्छ शहराची सुरुवात कोणत्याही मोठ्या योजनेने होत नाही; ती प्रत्येक नागरिकाच्या स्वयंशिस्तीने आणि प्रत्येक व्यावसायिकाच्या जबाबदारीच्या जाणिवेने होते. नियम पाळणारा नागरिक आणि सामाजिक भान जपणारा व्यावसायिक हीच खऱ्या अर्थाने विकसित समाजाची ओळख(Social Responsibility) आहे.
प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावीच; मात्र त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतः बदललो, तरच आपले शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि सुसंस्कृत(Social Responsibility) बनेल.
