(प्रतिनिधी) :ताथवडे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात गुरुवारी नागरिकांचा जनआक्रोश उसळला. विविध सामाजिक संघटना, महिला, युवक, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा द्यावी, तसेच पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी करण्यात (Tathawade Rape Case)आली.
या मोर्चात आमदार शंकर जगताप यांच्यासह माजी नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासनाने अधिक कठोर कायदे, प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चादरम्यान नागरिकांनी पोलिस प्रशासनाने संवेदनशील भागांतील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी, अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दोषींना तातडीने कठोर शिक्षा झाल्यास अशा प्रवृत्तींना आळा बसेल, असे मतही यावेळी मांडण्यात आले.

मोर्चाला संबोधित करताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतेही स्थान नाही. पीडितांना न्याय मिळवून देणे आणि दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी संपूर्ण समाजाने एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज आहे.”
शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या जनआक्रोश मोर्चाचा समारोप प्रशासनाला निवेदन सादर करून करण्यात आला. निवेदनाद्वारे आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई, पीडितांना तातडीने न्याय आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात (Tathawade Rape Case)आली.
