(पिंपरी, प्रतिनिधी ): साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतावादी, परिवर्तनवादी आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘साहित्यरत्न दौड २०२६’ या मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने युवकांमध्ये आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (२ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन, आर्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि ‘कलारंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
पहाटे बर्ड व्हॅली उद्यान, नोव्हेल चौक, चिंचवड येथून या दौडीला प्रारंभ झाला. केएसबी चौक, पिंपरी-चिखली रोड, महापालिका आयुक्त निवासस्थान, लाल बहादूर शास्त्री मार्ग (बीआरटी), कालेवाडी बीआरटी कॉरिडॉर, मदर तेरेसा उड्डाणपूल आणि पवना नदी पूल मार्गे जोतिबा गार्डन, पवनानगर येथे यु-टर्न घेत स्पर्धक पुन्हा बर्ड व्हॅली उद्यान येथे दाखल झाले.
या उपक्रमात विविध वयोगटांतील युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या दौडीने सामाजिक समरसता, आरोग्यदायी जीवनशैली आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.
यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला संघर्षाची प्रेरणा दिली. ‘साहित्यरत्न दौड २०२६’ ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून सामाजिक समरसता, आरोग्य आणि एकात्मतेचा संदेश देणारा लोकसहभागाचा उत्सव ठरला आहे. नागरिकांनी, माता-भगिनींनी आणि युवकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला.”

